
ध्यास आणि वेड’
‘ध्यास आणि वेड’ या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात, असे मला नेहमी वाटते. आयुष्याच्या वाटेवर केवळ फुलंच आणि फुलंच अंथरलेली नसतात, याची ज्यांना पुरेशी जाणीव नसते, ते त्यांच्या आयुष्यावर फार तटस्थपणे प्रेम करीत असतात. मग अशी माणसं संकटाची चाहूल लागली, की डगमगून जात नाहीत. माझंही असंच आहे. अपयशावर मात करण्याची ज्याच्या अंगी कला असते, तीच व्यक्ती जीवनात काही तरी वेगळं करीत असते. लहानपणी व महाविद्यालयीन जीवनात मी वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेत असे. वडिलांचे चांगले मार्गदर्शन, पाठबळ मिळाले आहे. त्यामुळे आत्मविश्वास वाढीस लागला. आई-बाबा यांच्या पाठिंब्यामुळेच विज्ञान (पारंगत) क्षेत्रात प्रगती करू शकले. माहेरप्रमाणेच आता सासरीसुद्धा मिळणारं प्रोत्साहन अनमोल ठरत आहे. ‘हिला हे सहज आणि सारं जमतच असतं, कोणतंही वर्क ती खूपच छान, सुंदर करून घेते’, असं म्हणून मला कौतुकाची थाप बसत असते. विविध श्रेत्रामधील विषय हाताळणे हा माझा छंदच आहे. समस्या अनेकांना येत असतात.

समस्यांपासून दूर पळू नका अन् त्यांना परकंही लेखू नका. मला काय त्याचे? मी तर असाच आहे.. मीच चांगला असा अहंभाव नका. ‘एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख’ या गाण्यातल्या कुरूपवेड्या पिलासारखीच आज अनेक बायकांची स्थिती असते. अंगी असलेल्या कलेला व्यक्त करण्याचे तिचे प्रयत्न अनेकदा चार भिंतींतच राहतात. असे होता कामा नये. कोणतंही काम ‘कामगिरी’ समजून पार पाडायला हवे. नुसतं ‘काम’ समजून उरकू नये. मनापासून गुंतवून घेतलं तर ते कंटाळवाणं ओझं वाटत नाही. आपली सर्जनशीलता, निर्भयता व चिकाटी या तिन्ही गोष्टी जर एकत्र आणल्या तर या जगात अशक्य काहीही नाही. कोणत्याही गोष्टीची इच्छा धरणं यातच 80 टक्के यश सामावलेलं असतं.

फक्त कधीही आपल्या मनातली भीती कोणत्याही संधीच्या आड येणार नाही, याची खबरदारी घ्यावी. अनुभव हा सर्वांत मोठा शिक्षक आहे. उदार दृष्टिकोन ठेवूनच मी जीवन यशस्वी करण्याचा प्रयत्न करीत आहे. मानवी जीवन हे अनमोल आहे. भोजनात जसे मीठ आवश्यक आहे, तसेच सुखासोबत दु:ख असणे आवश्यक आहे. दु:ख ही फार मौल्यवान वस्तू आहे. जर जीवनात दु:खच नसले तर कोणालाच परमेश्वराची आठवण येणार नाही. म्हणून समाजात, जीवनात वाटचाल करताना आत्मभान असणे जरुरीचे आहे, असे मला वाटते. अशाच पद्धतीने स्त्रियांनी जीवन जगायला हवे.. तशीच वाटचाल सर्वांनी करायलाच हवी……………….!
